एकदा टपरीवर खरं
अचानक भेटला होता देव
“हवा पाणी हाय का बरं?”
सलगी कराया झाली माझी उठाठेव
तिरस्कार थुंकून डोळ्यातनं मग
दिली जोरात ठेऊन चपराक त्यानं
“का कावलायस आज उग?”
विचारलं मी पुसत त्याची पाचही बोटं
“कारट्या, केवढी सुरेख रे होती
कोरली तुमच्यासाठी सारी सृष्टी
रक्तानं सारवून, धुळीनं माखून
गटारात घातलासा की रे ही पृथ्वी”
“म्या काय एकटा करणार एवढ्या जनात?
म्या कुठं काय बी नाही पेटवली काडी?”
“आग कशी नाही पेटत तुझ्या मनात,
म्हणूनच काढला लेका जाळ कानाखाली”