अनेक वेळा सागरास ही वाटत असावे
एकदा तरी चंद्रास जाऊन बिलगावे
मज्जाव करीत अनंत अंतर उभे
वेड्या लाटांनी सहज कापावे
पण नियमात असते भरती नंतर ओहोटी
थकुन लाटांना परतायचे असते माघारी
आणि मग अनंत अंतरेच सजवतात हा देखावा
चंद्राच्या तालावर लाटा घेतात मजेत झोका
म्हणाल तर प्रत्येक दृष्टीत दोनच सोबती
आकाश आणि त्याच्या छ्ताखालची धरणी
जरी वाटे होते भेट त्यांची क्षितिजावरती
याच आशेने ओलांडली हजारो क्षितिजे मिळून दोघांनी
मिठीत विसावण्यास मग धरती जेव्हा व्याकूळ असे
तिच्यासाठी जो गरजला नाही तो मेघ नसे
ह्या दुराव्यातच रंगतात रंग वसंत ऋतुचे
फुलते कुरुणात मग वसुंधरा घेऊन प्रीतीचे सडे
प्रवासात निघतात दोन तीर नदी बरोबरच
बागडणाऱ्या पात्रास सांभाळत नेतात खरंच
दोघांना ही तोडायचा असतो कर्माचा हा सापळा
टाकून सारे विचार करायचा असतो त्यांना ही आपला
येताच आठवण एकमेकांची मग जातो एक अश्रू ढळून
दोघांचा विरह सोडतो नदीला लहानाचे मोठे करून
आणि मग येतो प्रवासाचा शेवट हे जेव्हा दोघांना कळते
उगाच नाही नदी सागरा जवळ सर्वात खोल असते
विरहातच लपले असे हे निसर्गाचे धडे
न बोलता काही ह्या सर्वांनी आज पर्यंत ते गिरवले
मग का हे हृदय शोधते ह्या प्रश्नाचे उत्तर नवे
तुझ्या आणि माझ्या मधले अंतर निरंतर का राहावे?